सायली जेव्हा जोगतीणीची ओटी भरत असते तेव्हा ती सायलीचं नाव घेऊन म्हणते की, ‘काळजी करू नकोस सायली. तुला एका मोठ्या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागतंय, पण तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की कोणतीही वाईट गोष्ट तुझ्या आजुबाजूला फिरकू शकणार नाही.’ सायलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद ती तिला देते. तेव्हा सायली विचारते की, मधुभाऊ सुटतील ना? तेव्हाही जोगतीण देवीवर श्रद्धा ठेवण्याचा सल्ला देते. जोगतीण निघून जाते, पण सर्वचजण विचारात पडलेले असतात.
तन्वी अर्थात प्रिया जोगतीणीच्या भविष्यवाणीमुळे रागारागाने तिथून निघून जाते. तिने कल्पनाला असा आशीर्वाद दिलेला असतो की त्यांच्या घरी वर्षभरात पाळणा हलेल. अस्मिता तिला समजावते की ते काही खरं होणार नाही, मात्र अस्मिताला हेही समजत नाही की ती जोगतीण तन्वीबद्दल असं तिरकस का बोलली. अस्मिता म्हणते की आपल्याला आता हेच सिद्ध करायचं आहे की अर्जुन आणि सायली खोटे नवराबायको आहेत. तन्वीला असं वाटतं की आता काहीच शक्य नाही, असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा अस्मिता मनाशी ठरवते की अर्जुन-सायलीबद्दल तिच काहीतरी करेल.
अर्जुन-सायलीही त्या आशीर्वादामुळे काळजीत असतात, तेव्हा कल्पना तिथे येते आणि तिचा आनंद व्यक्त करते. ती आजी होईल असा आशीर्वाद जोगतीणीने दिल्याने तिला हा आनंद होत असतो. कल्पनाचं हे बोलणं ऐकून दोघांनाही अवघडल्यासारखं होतं. दुसरीकडे महिपतने ज्या गुंडाला सायलीला मारण्याची सुपारी दिलेली असते, तो अनेक दिवस फरार असतो. महिपतची माणसं त्याला पकडून आणतात आणि तो त्याची माफी मागतो. महिपत त्या गुंडाला मारुन टाकणार तेवढ्यात साक्षी तिथे येते आणि तो गुंड पळून जातो.
दरम्यान त्या रात्री सायली तिच्या डायरीत हॉस्पिटलच्या फाइलमधून काहीतरी लिहून काढत असते. अर्जुनने असंख्य प्रश्न विचारल्यानंतर ती सांगते की नेमकं ती काय लिहिते आहे. ती सांगते की हॉस्पिटमध्ये तिच्यावर जो साडेदहा लाखाचा खर्च झाला तो तिने लिहून काढलाय. तिच्यावर झालेल्या उपचाराचा खर्च ती परत देण्याचं म्हणते. तिला असं वाटत असतं ते की पैसे न देणं म्हणजे त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासारखं आहे. ती म्हणते की जर ती आश्रमात असती तर एवढा खर्च त्यांना परवडलाच नसता, कदाचित तिचा जीव गेला असता. सायलीचं हे बोलणं अर्जुनच्या मनाला खूपच लागतं. आता सायलीच्या या चांगुलपणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येईल का हे आगामी भागात पाहायला मिळेल.
पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, अर्जुन रागाने सायलीची डायरी फेकून देतो. तर नागराज तन्वीशी बोलत असतो की, २० वर्षांपूर्वी महिपतला तीन लोकांना मारायचं काम दिलं होतं तेही त्याला जमलं नाही, सायलीला मारणंही त्याला जमलं नाही. हे बोलणं सुरू असताना रविराज तिथे येतो, मात्र त्याने त्यांचं बोलणं ऐकलं की नाही हे आगामी भागातच समजेल. तर अर्जुन त्याच डायरीत काहीतरी लिहताना दाखवला आहे.
Read Latest Entertainment News And Marathi News
Source link
credite